
मुंबई : राज्यातील शाळा यंदा 15 जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे. तर विदर्भात उन्हाची तीव्रता जास्त असल्याने त्या ठिकाणी 30 जून रोजी शाळा सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुलांना आपल्या सुट्या व्यवस्थित प्लान करता याव्यात यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दिपक केसरकर यांनी दिली.
दिपक केसरकर म्हणाले, केंद्राचा नवभारत साक्षरता कार्यक्रम घेतला जाणार आहे. यापुढे शासकिय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवी मुलांचे शाळेचे कपडे, वह्या, शूज आणि सॉक्स हे शासनातर्फे मोफत दिले जाणार आहेत. तसेच प्रत्येक धड्यानंतर आता एक पान कोरे ठेवले जाणार आहे.
येत्या शैक्षणिक वर्षात एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे ‘आजी आजोबा दिवस’ साजरा केला जाणार आहे असं दिपक केसरकर यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण दिले जाणार. 20 मे पर्यंत सर्व त्रूटी पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना अनुदान देण्यात येणार आहे. शिक्षक सेवकांच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीमध्येही वाढ करण्यात आली आहे.
शालेय शिक्षण विभागांतर्गत घेण्यात आलेल्या विविध निर्णयांबाबत केसरकर यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. शाळापूर्व तयारीचा पहिला मेळावा २६ एप्रिल पासून आणि दुसरा मेळावा जून महिन्यात घेतला जाणार असून केंद्राचा नव भारत साक्षरता कार्यक्रम राज्यातही राबविला जाणार आहे. या वर्षीपासून शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश तसेच वह्या, बूट आणि सॉक्स हे शासनातर्फे दिले जाणार आहेत. पुस्तकांमध्ये प्रत्येक धड्यानंतर टिपण (नोट्स) काढण्यासाठी आता एक पान कोरे ठेवले जाणार आहे.
