राज्यातील १४ ठिकाणी भाजप-शिंदे गटाची युती फुटली; कोणत्या आहेत या महापालिका?
डिसेंबर ३०, २०२५
0
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या (Municipal Election 2026) घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याभरात आज राजकीय पक्षांमध्ये मोठ्या मोठ्या घडामोडीही घडल्या. महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. इच्छुकांना पक्षांकडून तिकीट मिळाल्याने अनेक ठिकाणी आंनदाचे वातावरण होते.तर काही ठिकाणी तिकीट न मिळाल्यामुळे इच्छुकांनी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केल्याचेही पाहायला मिळाले. पण त्याच वेळी पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोपही अनेकांनी केली. अनेक ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावर पक्षांत प्रवेश करणाऱ्यांना तिकीट दिल्यामुळे मोठा अंसतोष उफाळल्याच्याही घटना घडल्या.
राज्यात सर्वात ताकदीची मानली जाणारी भाजप- शिवसेना शिंदे गटाच्या युतीतही फूट पडल्याचे पाहायला मिळाले. महायुतीत जागावाटपावरून झालेल्या मतभेदांवरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना फुटली. काही महापालिकांमध्ये जास्त जागा मिळवण्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली. त्यामानाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कमी जागा मिळत असल्यामुळे शिवसेनेने भाजपसोबत युतीमध्ये लढण्यास स्पष्ट नकार दिला. स्थानिक राजकीय समीकरणे आणि ग्राऊंडलेव्हलवर असलेली परिस्थिती पाहता दोन्ही पक्षांनी काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला.
जागावाटपावरून मतभेद झाल्यामुळे राज्यात १४ महापालिकांमध्ये भाजप-सेनेची युती तुटली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, संभाजीनगर, नाशिक,नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगली, जालना या महापालिकांमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे या महापालिकांमध्ये तिरंगी किंवा बहुरंगी लढती होण्याची शक्यताही वर्तवलीजात आहे.
महायुतीत तडे असले तरी मुंबई–ठाण्यात भाजप-शिंदे गटाची युती कायम
राज्यातील 14 ठिकाणी महायुती तुटलेली असली, तरी मुंबई आणि ठाण्यासारख्या राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची युती कायम ठेवण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना युतीपासून दूर ठेवण्यात आल्याने मुंबई आणि ठाण्यातील राजकीय समीकरणे वेगळी असणार आहेत.
महायुतीतील अंतर्गत मतभेद अनेक ठिकाणी उघड झाले असले, तरी मुंबई आणि ठाणे या प्रतिष्ठेच्या महापालिकांमध्ये भाजप आणि शिंदे गटाने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याउलट अजित पवार गटाला या दोन महत्त्वाच्या महापालिकांमध्ये स्थान न दिल्याने नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, राज्यातील सर्व महानगरपालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या महापालिका भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत.
ज्या ठिकाणी युती कायम आहे आणि ज्या ठिकाणी युती तुटली आहे, त्या दोन्ही परिस्थितीत मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आगामी निकालांमधून महायुतीच्या रणनीतीला कितपत यश मिळते, हे स्पष्ट होणार आहे.
